पर्वत, नद्या, झाडे, वेली, पक्षी, प्राणी, समुद्र, वारा, पर्जन्य, सारे निसर्गनिर्मितीसाठी आवश्यक असणारे अणू रेणू आणि ह्या सर्वांत प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले आपण मानव प्राणी! निसर्ग आणि मानव यांच्यात संवाद साधण्याची कला विलक्षण आहे. त्या निसर्गाची भाषाही विलक्षणीय, सहज आहे. निसर्गाला भाषेचा आधार घ्यावा लागत नाही. पावसाचा पहिला थेंबही हितगुज करतो धरणीशी, आता मी तुझ्यात सामावलोय, होऊ देत नवनिर्मिती, तू हो पुन्हा सुजलाम सुफलाम. ती कुजबूज आपण कधीच ऐकू शकत नाही. ती भाषा आपणाला समजत नाही, तरीही त्या गर्भितार्थाची अनुभूती आपण अनुभवतो निसर्गाकडून. आणि आपण भाषाधार घेऊनसुद्धा एका कोड्यात वावरतोय. कदाचित ह्यातच सारं मर्म आहे. 'भाषा' असते मानवी जीवनातल्या 'व्यवहारी' पणासाठी. आणि मनाचा ठाव घेण्यासाठी, अंत:करण निरखण्यासाठी वा एकांतात देखावे रंगवण्यासाठी फक्त 'शब्दच' मदत करतात. तेव्हा आपल्याला हवं असतं फक्त हितगुज, मनांची कुजबूज, अलगद साधावा संवाद कुणाशीही, द्यावी सुखा - दु:खाची, यशापयशाची, गुणदोषाची, होत्या नव्हत्याची, चांगल्या वाईटाची अनुभूती आणि तिथेच गवसते कविता