Posts

दर्द सारं पेल्यात

नजरेआड थांबून गेलेलं एक स्वप्न पाण्याचे सपकारे मारून अंधुकशी कल्पना नाही देत कुणाला काही सांगायचंय... मला काही ऐकायचंय हे मात्र माझ्यापुरतं खरं नाही सांगत पण मी कुणाला नाही विचारत कुणाला मला ओळखून घे अशी सरमिसळ होत जाते गर्दीतून आपली आर पार लक्ष देऊ नये कुणी कुणास इतकी गर्दी... पहाटेचे डोळे उघडतात अजून हा एक आशावाद उशा पाशीच सोडून स्वप्नाला निजत ठेवतो ते कोण म्हणतं, स्वप्न पाहत नाही ती माणसं नाही नि जी स्वप्न पाहतात त्यांचं काही खरं नाही दर्द सारं पेल्यात पिऊन मोकळं होता येतं त्या जमान्यात ते पब मध्ये नशेच्या धुरासोबत उडून जाणारं स्वप्नासारखं उशाशी घुटमळत राहणारं पण झोप न येण्याचं कारण अजूनही नजरेआड थांबून ऐकेक रात्र धुरासारखं उडत जाणारं आयुष्य इतकं खर्ची होऊ दे की बघ, स्वप्न थांबतील...

ज्यांचं कुणीच नसते

उसळत जाणाऱ्या रक्ताला हिमोग्लोबिन आठवलं, आणि थोडा निवांत झाला इथेच तुझी आठवण दाटते हा सुद्धा एक हृदय विकार! खिसा रिकामा असला तरी प्रेम भरपूर करा असं सांगणाऱ्या भूमीत तू सोडून गेलीस, तेव्हा आधार कार्डही होतं माझं. आई वडिलांना वृद्धाश्रमचा रस्ता दाखवून ठेवलेला... पण मग तेही नाही गेले मित्र सारे पुण्याचे, पुणेरी पाट्यांनीच झोडायचे मूळचे तिथले नव्हते तरी. पैसा सर्वस्व आहे हे तुझं सांगणं पटलं होतं मला पण त्यासाठी कुणाला सोडून जावं लागत नाही हे कोण म्हणालं ते आठवत नाही, पण तू नसशील इतकं नक्की. असहिष्णुता प्रेमात असते? हे नेमकं कुणाला विचारु मी धर्माचा संबंध नसला तरी जातीशी लावतातच लोकं हे निमित्त झालं राजकारणाचं वेगळं झाल्याची सुद्धा पार्टी देणाऱ्या देशात तू न सांगता गेलीस. इतकंच काय ते दुःख मी माझं, सेलिब्रेट करतोय आणि फुंकर घालणारं कुणी आजू बाजूला नसताना थंडी सुरू झाली. ज्यांचं कुणीच नसते ते सुद्धा लगेच नाही मरत...!

माहितीच्या अधिकारात

प्रेमाचा... नको उल्लेख आभाळ निरखत बसतो, थेंब प्रेमाचा पडूनसुद्धा कसा रुजत नाही मी? उत्तरार्धात उत्खनन, नि सापडलं मन नाही पटत. लहर एक उध्वस्त करू शकते शहर मी मर्त्य..., हे मात्र पटेल क्षणार्धात. माहितीच्या अधिकारात, ती सांगेल खरं... कशासाठी होता तो कहर? विकलं गेलंय जिथे सारंच तिथं... उत्तर खरेदी करतोय एक भणंग.

कलुषित पाणी

ज्यात काही अर्थ असेल असं सांग देहबोली नि जीभ बदलत राहते सूर्य उगवला, सूर्य मावळला... घरातून निघ आणि परत घरी पाहू नकोस तू दिनवण्या नजरेने अशाने गरिबी कमी होत नसते आमची जवाबदारी खांदे शोधते 'लाचारी'वर P.hd करशील का! आगीने शिकवली जगण्याची चव संहाराची ठिणगी तू शोधली कुठे? पाण्याचा तुही न मीही पाण्याचा हे कलुषित पाणी प्यावं कुणी? मी एकदम साधा सरळ माणूस लोकांनी लोकांचं काय ते पहावं.

वेड्यांच्याच देशात राहिलास तू

वेड्यांच्याच देशात राहिलास तू निघायचं म्हणून निघालास आधुनिक जगात राहूनही पोहोचायचं कुठे हे तू ठरवू नाही शकलास! शाळेत एकाच बाकावर वा मागे पुढे बसून यथेच्छ मार खाऊन जमलं तेवढा अभ्यास करून जगण्याची किमान आशा पल्लवित ठेऊ शकलो इथवर समाधान. पुढे सर्व एक साची जगणं... बुद्धीच्या कुवतीनुसार वा जातीनुसार परंपरागत... बदल कशात झाला हे मात्र खूप साऱ्या घटना आठवल्यावर ... 'वय' ह्या शब्दापाशी येऊन थांबतो अकलेचे तारे तोडण्यात अर्धमग्न मनाचं पूर्ण योगदान जमेची बाजू धरत अल्पसंतुष्टी लादतो आमच्या पुढच्या पिढीवर रिकामा वेळ...? वाचन, मंथन, मनन... किंवा परवा परवाचं शिक्षण बुद्धी देऊन गेल्याचं दाखव कृतीत उतरवून...! जंगलात नाही राहत आपण ह्याचं किमान भान ठेव नि आपण काहीच बदलू शकत नाही तर निदान उद्ध्वस्त करण्याचा विचारही डोकावू देऊ नको... मेंदू फार मोठी चीज आहे समजायचं वय सरलंय, आणि मानेवर मिरवून फिरलं तरी... वेड्यांच्याच देशात राहिलास तू... मित्रा...!!!

शून्य सावली

निवांत भेटू बसू, बोलू उण्या दुण्याने दुनियेचं बरं वाईट नाही होणार नि गीता, घटना, इत्यादीला साक्षी ठेवून कुणाच्याही भावना दुखणार नाहीत किमान इतक तरी मन मोकळं होऊ. तुझा सल्ला, मत नि माझी झालेली गत आप आपल्या जागी तटस्थ ठेऊन मध्यम मार्ग सापडेल इतकंच खोलवर जाऊ. राजकारण, गर्दीचं निष्ठुर गणित, बकालपणा, समजूतदारपणा ही भानगड (देशद्रोह?) नको आपल्यात. मरण्याची तर गोष्टच सोड. हतबलता नशीब देव आपल्या हातात काय असतं? तत्सम शब्दांचं वजन वाहण्यापेक्षा बघूया भारनियमन कमी करता येईल का! नाही, परिपूर्ण नको होऊया आपल्यालाही कदाचित एखाद्या छोट्या समाजाचा अवतार बनवतील अवघड होऊन बसेल सारंच... जाताना मात्र मला घरापर्यंत सोबत दे शून्य सावलीही म्हणतात होत असते जगात...

मृगजळ

परतून येतील दिन कसे पुन्हा हा प्रश्न नि हा छंद, उरला जुना विरला क्षण झोकात, कुठे बरसला शोधतोय वास्तव कठोर, कसा हरवला उणिवांचं नव्हतं काही, जीव जडला काहीतरी मुद्दा हवाच चूक झाकायला अंदाज चुकला कुठे, कुणी वर्तवला गहन विचाराअंती मेंदू निवर्तला थेंबांना कळला होता गोंधळ मनातला सांभाळूनी खरच हा वादळ शमवला राहू दे आग थोडी, उरात कहर हा परतून येतील दिन मृगजळ असा उरला