शून्य सावली

निवांत भेटू
बसू, बोलू
उण्या दुण्याने दुनियेचं
बरं वाईट नाही होणार
नि
गीता, घटना, इत्यादीला
साक्षी ठेवून
कुणाच्याही भावना दुखणार नाहीत
किमान इतक तरी मन मोकळं होऊ.
तुझा सल्ला, मत
नि माझी झालेली गत
आप आपल्या जागी तटस्थ ठेऊन
मध्यम मार्ग सापडेल इतकंच
खोलवर जाऊ.

राजकारण, गर्दीचं निष्ठुर गणित,
बकालपणा, समजूतदारपणा
ही भानगड (देशद्रोह?) नको आपल्यात.

मरण्याची तर गोष्टच सोड.

हतबलता
नशीब
देव
आपल्या हातात काय असतं?
तत्सम शब्दांचं वजन वाहण्यापेक्षा
बघूया भारनियमन कमी करता येईल का!

नाही, परिपूर्ण नको होऊया
आपल्यालाही कदाचित एखाद्या
छोट्या समाजाचा अवतार बनवतील
अवघड होऊन बसेल सारंच...

जाताना मात्र मला
घरापर्यंत सोबत दे
शून्य सावलीही म्हणतात
होत असते जगात...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य