सुरुंग वाटेत पेरून रोज घरी परततो संकटाची पावलेही जड असतात…, ऐकल्यापासून घर कधीतरी छावणी, कधी शत्रूही सोबत राहतात. सुखा दुःखाची चढाई एकमेकावर केव्हाही शांतीचा आग्रह धरत, माझाच बळी देत मी दोघांचंही अस्तित्व नाकारतो…, कारणमीमांसा करतो तर हजारो वर्षांपूर्वीचं कुणाचं हास्य कानी पडतं…! माझंच सारं जीणं नादुरुस्त असेलसं समजून घराबाहेर पडलं तर 'संध्याकाळी लवकर घरी याल' म्हणत, माझ्या सावलीत आणि एक स्त्री देह वावरतो परिस्थितीची सदैव जाण करून देत ती मोकळं करते मला… तिचाही संसार ती माझ्यातच पाहते! चेहेऱ्याच्या सर्व स्नायुंना आनंद विकाराचा झटका देत माझं खोटं हास्य तिच्या गळी उतरवत, पाय उतार होतो… 'दिलको बेहेलाने के लिये' वगैरे वगैरे आठवत गालिब सारखे दोन - चार जणं प्रवासात सोबत करतात. अवैध संपत्ती जप्त करतात अगदी तसंच या प्रश्नांचही होऊ शकते का? हा क्रांतिकारी विचार लोकसभेत शुन्य प्रश्नोत्तर काळात चर्चिला जाऊ शकतो का? इतकं मन काव्यात्मक होऊन जाते… अर्थात ३६ रुपयांत गरिबी संपवता येऊ शकते हाही आधार असतो त्या विचारला. कुत्र्याने अंग झटकाव तसं स्वप्नही झटकते मला ...
Comments
Post a Comment